ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय; जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांत सुरू होणार पाचवीचा वर्ग
गावातच मिळणार पुढील शिक्षणाची संधी; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत, पालकांचा आर्थिक भारही कमी
सोलापूर व्हिजन, दि. २ जुलै
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागू नये, या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
१५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ही मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली.
यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची गैरसोय, आर्थिक अडचणी आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे चित्र होते. आता गावातच पाचवीचा वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षणाला नवी चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सातत्यपूर्ण प्रवास गावातच पूर्ण करता येणार आहे. तसेच पालकांचा वाहतूक खर्च, वेळ आणि मानसिक ताणही कमी होईल. शिक्षणाचा हक्क अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढेही सातत्याने काम केले जाईल.”
हा निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळ देणारा ठरत असून, भविष्यात आणखी पात्र शाळांमध्ये उच्च प्राथमिक वर्ग सुरू करण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.