संविधान बदलण्याची हिम्मत कोणातही नाही : – आ.विजयकुमार देशमुख
संविधानाला मानणाऱ्या भाजपला मतदान करण्याचं केलं आवाहन…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –
विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच सोलापूर शहर उत्तर मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचे मुकुंद नगर तालीम संघ दशरथ कसबे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात आमदार विजयकुमार देशमुख यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक शिवानंद पाटील,प्रा.नारायण बनसोडे, अनंत जाधव,अमर पुदाले, अजित गायकवाड, श्रीनिवास संगा, राजाभाऊ काकडे, ब्रह्मदेव गायकवाड, अजित गादेकर, सिद्धू शिवशरण, बाळासाहेब आळसंदे, लखन भंडारे, सुजित खुर्द, प्रवीण कांबळे, संदीप सांगा, संतोष कुमार मठपती, डॉक्टर शैलेश उंबरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेकडो कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला. आ.देशमुख यांच्या सत्तेतल्या ७ वर्षाच्या कार्यकाळात सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आणली. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटेल.सध्या ते काम अंतिम टप्प्यात आला आहे. लाड कमिटीचा अहवाल आम्ही आणि आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला न्याय दिला. आजपर्यंत कुणी निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिला. आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत सोयी सुविधा देणारे आणि बुद्ध वंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने या देशात जातिवाद धर्मवाद मानला नाही. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही पी सिंग यांच्याकडे शिफारस केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिमान वाटावं असं प्रयत्न भाजपच्या सरकारने केल. लाड कमिटीच्या शिफारसी लागू होऊन होण्यासाठी आम्ही आणि आमदार देशमुख यांनी सोलापूर दोन वेळा बंद केलं. देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीला उभारणाऱ्या कोठे यांनी महापालिका ताब्यात असताना लाड कमिटीचा अहवाल दाबून ठेवला.याची माहिती सगळ्यांना आहे. आम्ही आणि देशमुख यांनी अहवाल बाहेर काढला त्यामुळे हजारो परिवारांना नोकऱ्या मिळाल्या याचा साक्षीदार आम्ही आहोत. आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना शेकडो कोटी निधी दलित वस्तींना आणून दिला. त्यामुळे आज आपल्या दलित वस्तीचा चेहरा मोहरा बदलला आहे. ३५ वर्ष दलित वस्तींना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सतत दलित वस्तीत जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि बुद्ध वंदना म्हणणारे एकमेव आमदार देशमुखच आहेत असे जोशपूर्ण भाषण आनंद चंदनशिवे यांनी यावेळी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुखा अमोल शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शहर उत्तर हा मतदार संघ भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार देशमुख यांनी अनेक माणसे जोडली. पालकमंत्री असताना अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात उभे केले. त्यांना पुन्हा राज्यातील टॉप टेन मध्ये आपल्याला आणायचा आहे. आणि या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री करायचा आहे असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे संयोजक दशरथ कसबे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की आमच्या अनेक भगिनी हजार पंधराशे रुपये साठी अनेक घरांमध्ये धुणी भांडी करतात. महायुती सरकारने प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे. पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असून आपण पण मुख्य प्रवाहात येऊन भाजपच्या मागे आपली शक्ती द्यावी. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आपल्या दलित वस्ती मध्ये सुधारणा झाली नाही. कोणता निधीही आला नाही. मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शेकडो कोटीचा निधी आणून विकास कडून आणला आहे. संविधान बदलणार अशी चुकीचा संदेश सगळीकडे पसरविला. मात्र मोदी यांनी नवीन संसद भावनाला संविधान भवन नाव देऊन संविधान किती मजबूत आहे हे दाखवून दिल. आपल्या समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या भामट्या लोकांना आपण किती दिवस बळी पडायचं असा सवाल उपस्थित करत आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा आवाहन यावेळी कसबे यांनी केलं. या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी तर आभार गौतम कसबे यांनी मानले.