हाहाकारा नंतर सोला”पूर” परिस्थिती जैसे थे !
अक्कलकोट रोडवरील कारखान्यात गल्लीबोळात साचलेले पाणीच पाणी मोटर लावून पाण्याचा उपसा सुरू
सर्वत्र चिखल, पाण्यात भिजलेला संसार अन् वह्या पुस्तक
सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर प्रतिनिधी
बुधवारी सायंकाळची ती रात्र सोलापूरकरांसाठी वैऱ्याची ठरली. कधी नव्हे तो ११८ मिलिमीटर इतका जोरदार पाऊस रात्रीच्या सहा तासात जोरदार बरसला. या पावसामुळे सोलापूरकरांचे हाल बेहाल झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. कित्येकांना रात्र जागून काढावी लागली. तर अनेक कारखान्यात पाणी शिरल्याने कच्चामाल आणि पाठवण्यासाठी पॅक करण्यात आलेला पक्कामाल खराब होऊन लाखोंचे नुकसान झाले.












दरम्यान, सोलापुरात आलेल्या तुफान पावसा नंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थेच होती. महापालिका प्रशासनाच्या वतीने साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी मोटर लावून पाणी उपसा सुरू केला गेला. अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर भागात ट्रॅक्टर आणि मोटारच्या माध्यमातून पाणी उपसा केला. पाण्याखाली गेलेल्या देसाई, गुंडेली, सोमनाथ या सर्व कारखान्यातील साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक तसेच ड्रेनेज विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे चित्र दिसून आले.
विडी घरकुल परिसरात देखील पाणी साचलेले चित्र कायम होते. अनेक सखल भागात आजही पावसाचे पाणी रस्त्यांवर वाहत होते. याच पाण्यातून विद्यार्थ्यांना व ज्येष्ठांना वाट काढावी लागली. जेसीबी साह्याने वाहत्या पाण्याला वाट करून देण्यात आली. परंतु नाले सफाई न झाल्यामुळे पावसाच्या व सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकला नाही.
नीलम नगर परिसरातील नवले नगर, कल्लाप्पा नगर आदींसह विविध भागात देखील पावसाचे पाणी घराघरात शिरल्याने येथे पाणी निचरा करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. मात्र घरात पाणी शिरल्याने अनेक संसार उपयोगी साहित्य भिजून खराब झाले होते. येथील महिलांना आपला उदरनिर्वाह करणे देखील जिकिरीचे बनले आहे. घरवजा छोट्या कारखान्यात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वंदना गादास यांच्या कपडे शिवण्याच्या ऑटोमॅटिक मशीन पाण्याखाली गेल्याने त्या खराब होऊन त्यांच्यावर संक्रांत ओढवली आहे. आलेली ऑर्डर कशी पूर्ण करायची अशी भ्रांत त्यांच्यासमोर उभी टाकली आहे.
कल्लप्पा नगरात राहणाऱ्या विभुते या महिलेच्या घरातील तयार केलेल्या १ हजार बिड्या भिजल्याने त्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडाला. त्याशिवाय साहित्याचे नुकसान झाले. पावसाचे पाणी, सांडपाणी तसेच मोकळ्या जागेत तलावाप्रमाणे साचलेले घाण पाणी असे सर्वत्र पाणीच पाणी येथे पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेचे अधिकारी येथे पाहणी करून पंचनामा केल्याचे सांगितले. परंतु मदत कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे.
महापुराचा तडाखा बसलेल्या शेळगी भागातील मित्र नगर आणि कुमारस्वामी नगर मध्ये देखील हेच चित्र दिसून आले. महापुरानंतर घरातील सर्व साहित्याचे नुकसान होऊन संसाराची वाहत आहात झाली. घरात पाणी शिरल्याने येथील राहवासी रोहित सूर्यवंशी आणि सुवर्णा सूर्यवंशी यांना टेम्पोमध्ये रात्र काढली लागली. आठवड्याचा पगार तसेच घरातील उर्वरित शिधा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्या कुटुंबाचे अतोनात हाल झाले.
मित्र नगर शेळगी परिसरात राहणाऱ्या मेहता शाळेत इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या शाहिद शेख या शाळकरी मुलाचे पुस्तके आणि वह्या पाण्यात भिजल्याने नाईलाजाने त्याला शाळेला दांडी मारावी लागली. त्या भिजलेल्या वह्यातील अक्षर मात्र गायब झाली होती. पुस्तके उन्हात वाळवत ठेवावे लागले.
बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. आमच्या कारखान्यात पावसाचे पाणी शिरल्याने तयार झालेला लाखोंचा पक्का माल पाण्यात भिजला आहे. टॉवेल बनवण्यासाठी मागवलेला कच्चामाल देखील पाण्यात भिजल्याने भविष्यात ऑर्डर पूर्ण करणे अवघड बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. तयार झालेला पक्का माल आज पाठवून द्यायचा होता. परंतु या पावसामुळे आमचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाले आहे. शासन आणि प्रशासनाने यावर तोडगा काढावा.
– रामदास मंथा, सोमनाथ टेक्स्टाईल अक्कलकोट रोड