सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाचे भवितव्य धाराशिव जिल्हा उपनिबंधकांच्या हाती…!
उच्च न्यायालयाच्या सुनावणीत यासंबंधी पुढील कार्यवाही निवडणूक अधिकारी स्तरावर घेण्याचे दिले निर्देश
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ जून
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधीची पुढील कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर घेण्यात यावी. असे निर्देश दिल्यानंतर सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाचे प्रकरण धाराशिव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक धाराशिव यांच्याकडे होणार आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाचे लक्ष धाराशिवकडे लागून राहिलेले आहे.
दरम्यान, बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक होण्यापुर्वी तक्रारदार तथा याचिकाकर्ते मिलिंद मऱ्याप्पा मुळे यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, पणन संचालक यांच्याकडे महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणुक) नियम २०१७ मधील कलम २७ (१) प्रमाणे एकूण १५ उमेदवाराविरुध्द अपील दाखल केले होते. परंतु सदरचे अपील पणन संचालक पुणे यांनी फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते मिलिंद मुळे व राहुल रमेश यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी (दि. २४) एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधिश अमित बोरकर यांच्यासमोर झाली.
सदरची सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांना स्वातंत्र्य देऊन जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणुक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे याचिकाकर्ते मिलिंद मुळे यांनी उदय उर्फ रेवणसिध्द चंद्रकांत पाटील, दिलीप ब्रम्हदेव माने, नागप्पा म्हाळप्पा बनसोडे, प्रथमेश वसंत पाटील, राजशेखर विरुपाक्षप्पा शिवदारे, सुरेश सिद्रामप्पा हासापुरे, श्रीशैल बसवेश्वर नरोळे हे सहकारी संस्था सर्वसाधारण निवडुन आलेले आहेत. महिला राखीव मधून निवडुन आलेले इंदुमती परामानंद अलगोंडा, अनिता केदार विभुते व सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमध्ये अविनाश श्रीधर मार्तंडे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील सुभाष रामचंद्र पाटोळे, तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातून निवडुन आलेले सुनिल ब्रम्हानंद कळके, तसेच राहुल रमेश बनसोडे यांनी श्री चाँदा गफार जब्बार असे एकूण १३ संचालकांच्या विरुध्द महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणुक) नियम २०१७. मधील नियम ७२ (अ) प्रमाणे जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सोलापूर यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला होता.
दरम्यान,सदरच्या अपील अर्जाची सुनावणी घेण्याकरिता तत्कालिन जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिलेला आहे. त्यांनी निवडणुक पार पाडलेली आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय व घेतलेला निर्णय कायद्याने फिरवता येणार नाही, तसे न्यायोचित होणार नाही, त्यामुळे त्यांनी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अभिप्राय मिळणेबाबत त्यांनी निवडणुक प्राधिकारणाकडे मार्गदर्शन मागविले. त्यावर राज्य सहकारी निवडणुक प्राधिकारी यांनी सदरच्या पत्रामध्ये अभिप्राय देताना सांगितले की, या प्रकरणी जिल्हा निवडणुक अधिकारी सोलापूर यांनीच निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कृषि उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया पार पाडली आहे. नामनिर्देशनपत्र मंजुरी व नामंजुरीबाबत नियम २७ अंतर्गत दिलेल्या निर्णयाविरुध्द नियम ७२अ अंतर्गत अर्ज दाखल झाल्याने एकाच प्राधिकाऱ्याला दोन वेळा निर्णय घेणे क्रमप्राप्त होत असून सदरची बाब न्यायोचित नसून नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिने योग्य होणार नाही. सबब, जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांचे कार्यालयाकडे कृषि उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीच्या निवडणुक अनुषंगाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणुक) नियम २०१७ मधील नियम ७२ (अ) अंतर्गत दाखल सर्व अर्ज पुढील कार्यवाही करिता आपले कार्यालयात वर्ग करण्यात येत आहे.
असे निवडणुक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांना सूचित केले आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याचिकाकर्त्यास लेखी पत्राद्वारे कळविलेले आहे. सदरच्या आदेशामुळे राजकीय एकच गोटात खळबळ माजलेली असून जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी धाराशिव यांच्याकडे या प्रकरणी सुनावणी होऊन निकाल लागण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अशा आशयाचे पत्र माहिती अधिकार व याचिकाकर्ते मिलिंद मऱ्याप्पा मुळे यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) दाखल अर्ज व अनुषांगिक कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धाराशिव यांच्याकडे पुढील कार्यवाही पाठविण्यात येत आहे. तरी सदर विषयी आपण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धाराशिव कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.