सोलापूर व्हिजन प्रतिनिधी,
सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना इलेक्ट्रिक आय.टी.आय. व महावितरण विभागात अप्रेंटिस कोर्स पूर्ण करूनदेखील त्यांना अद्याप पर्यंत नोकरीमध्ये समाविष्ट न केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जुनी मिल कंपाऊंड सोलापूर येथे असिस्टंट जनरल मॅनेजर सुजाता पाटील यांना स्मरण पत्र दिले.

त्या पत्रामध्ये पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी दिलेल्या पत्रास अनुसरून तहसीलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी योग्य त्या कारवाईस्तव कार्यालयाकडे दिलेले दि.१७ जून २०२५ रोजीचे पत्र याच्या अनुषंगाने अद्याप पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील तरुण-तरुणी हे इलेक्ट्रिक आय.टी.आय. व तसेच महावितरण विभागाकडून अप्रेंटिस कोर्स पूर्ण करूनदेखील त्यांना अद्याप पर्यंत नोकरीची संधी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतीक्षा यादीमध्ये नाव येईपर्यंत जिल्ह्यातील तरुण-तरुणींना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी व आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीची आर्थिकदृष्ट्या उन्नती होण्यास व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोलाचे सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, शुभम काळे आदी उपस्थित होते.
