बाबासाहेब के सन्मान में काँग्रेस मैदान मे !
सन्मान मोर्चातून काँग्रेसने व्यक्त केला शहा यांचा निषेध ; केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनामाची केली मागणी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ डिसेंबर
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद सोलापूर शहरात थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. विविध संघटना माथाडी कामगार यांच्या आंदोलन मोर्चानंतर आता काँग्रेस बाबासाहेबांच्या सन्मानासाठी मैदानात उतरली आहे. काँग्रेसभवन समोर जोडेमार आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता, खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आल्यानंतर आंदोलनात आघाडी घेतलेली दिसत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सन्मान मोर्चा काढण्यात आला. यामोर्चामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन, जोरदार निदर्शने केली.

दरम्यान, या सन्मान मोर्च्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती. यावेळी “जय भीमचा नारा देत अमित शहा माफी मागा अमित शहा यांनी राजीनामा घ्यावा……” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुना एम्प्लॉयमेंट चौक, सात रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
या मोर्चात शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, भिमाशंकर टेकाळे, डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मधुकर आठवले, अशपाक बळोरगी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला शहर अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, आशा म्हेत्रे, वाहिद बिजापुरे, बसवराज म्हेत्रे, श्रीशैल रणधीरे, संतोष सोनवणे, जितू वाडेकर, तिरुपती परकीपंडला, केशव इंगळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचे वक्तव्य केले त्यावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आता त्यांच्या विरोधात देशात चळवळ सुरु झाली आहे, त्यांनी माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही.
– प्रणिती शिंदे, खासदार