मंगळवेढा-बोराळे रस्त्यावर उड्डाणपूलसाठी खा. प्रणिती शिंदेंचा पाठपुरावा…
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ग्रीन सिग्नल
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२ मार्च
सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मंगळवेढा शहरातून जातो. या मार्गामुळे मंगळवेढा ते बोराळे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत, असुन या महामार्गावर बोराळेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल किंवा अंडरपास करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात खासदार शिंदे यांनी मंगळवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची निवेदन सादर केले आहे. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत मंगळवेढ्यातील प्रफुल्ल सोमदळे, आनंद हजारे उपस्थित होते. मंगळवेढा बोराळे रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा शहरातून जातो. या महामार्गाच्या निर्मितीवेळी मंगळवेढा बोराले या रस्त्याच्या अंडरपास अथवा उड्डाणपुलाचा समावेश होणे गरजेचे होते. मात्र तो उड्डाणपूल अथवा अंडरपास अद्यापही न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. तसेच सोलापूर हून मंगळवेढा कडे येताना मंगळवेढ्यातील उड्डाणपूलस एकूण सहा रस्ते कनेक्ट होतात, सदर रस्त्याला बायपास रोड देखील कनेक्ट होतो, बायपास वरून लोडेड १६ चाकी वाहने व एसटी देखील उड्डाणपूला खालून जातात यांना व्यवस्थित टर्न घेता येत नाही, त्यामुळे वाहनांची जाताना उड्डाणपुलाखाली कोंडी होते, या बाबीचा देखील या बैठकीत विचार करण्यात आला, यावर गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत स्वतः जागेवर जाऊन, परिस्थिती पाहून, योग्य ते रस्त्याचे अंतर वाढवावेत, जेणेकरून वाहने व्यवस्थित टर्न घेऊ शकतील आणि सुरक्षित जातील व नागरिकांचा जीव डोक्यात येणार नाही याची दखल घेण्यास आदेश दिलेले आहेत.
खा.प्रणिती शिंदे यांनी गडकरी यांच्याशी बोलताना सांगितलं की, जर या रस्त्यावर उड्डाणपूल किंवा अंडरपास झाला तर वाहतूक कोंडी कमी होईल. रस्ता सुरक्षित होईल आणि ग्रामीण भागातील लोकांना मंगळवेढा शहरात येजा करणे सोयीचे होणार आहे. या बोगद्याच्या कामासाठी सोलापूर विभागातील महामार्ग प्राधिकरणाने ८४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या प्रस्तावास तातडीने मंजूरी देऊन ग्रामीण भागातील जनतेची रस्त्याची समस्या सोडविण्याची विनंती खा.शिंदे यांनी यावेळी नितीन गडकरी यांना केली.