‘तुम्ही मदत का करत नाही, टेबलावर बसून काम करू नका” कृषिमंत्री दत्तात्रेय भरणें कडाडले
अनुउपस्थितीमुळे नाराज झालेल्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून सुनावले खडेबोल
पूरग्रस्त माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना बाधित शेतकऱ्यांनी गराडा घालत केला प्रश्नांचा भडीमार…

- – माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना करावा लागला संतप्त शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना
- – मंत्री भरणेंनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून मदत न पोहोचल्याबद्दल विचारला जाब
- – दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची भरणेंनी शेतकऱ्यांना दिली हमी
- – चारा आणि जेवणाची तात्काळ व्यवस्था करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर दौरा चांगलाच गाजला. जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी तसेच इतर अधिकारी दौऱ्यात उपस्थित नसल्याने मंत्री भरणे चांगलेच भडकले. त्यांना एकट्यांना पूरग्रस्तांच्या संतप्त प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. कृषिमंत्र्यांच्या पुढे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे गाऱ्हाणे मांडत एकच गराडा घातला. यावेळी कृषी मंत्री भरणे यांना नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी अनवाणी पायाने चिखलातून पायवाट काढावी लागली. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये उभारून बाधित शेत शिवाराचे विदारक दृश्य न्याहाळले.

शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकल्यानंतर भडकलेले कृषिमंत्री भरणे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला. कलेक्टरसाहेब, मी उंदरगाव येथे आला आहे. या लोकांना सीएम डीसएमनी जाहीर केलेली मदत अजून कशी मिळालेली नाही हो. तुम्ही का मदत करत नाही हो. अजून मदत का पोचलेली नाही. येथील लोकांचा उद्रेक भरपूर आहे.पूरग्रस्तांची जेवणाची व्यवस्था बऱ्यापैकी झालेली आहे. फक्त चाऱ्याचा विषय तेवढा इथला मिटवा. अशा सूचना केल्या.

साखर कारखान्यांनी व इतर सर्वांनी मदत केली आहे. तुम्ही प्रशासनाने चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना मंत्री भरणेंनी केली. माध्यमांशी बोलत असतानाच कृषिमंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापले. तसेच, पूरग्रस्तांसाठी करावयच्या उपाय योजना याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची माहितीही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला मदत मिळवण्यासाठीच गेले होते. येत्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत मदतीबाबत चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा संताप आणि उद्विग्नता, आक्रोश हा स्वाभाविकच आहे. आम्ही शेतकऱ्यांचीच पोरं आहोत. कारण अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.

मंत्री भरणेंनी जिल्हाधिकारी यांना सुनावले खडेबोल
दौऱ्यात प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे मंत्री भरणेंनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून ‘सीएम, डीसीएमंनी मदत जाहीर केली होती. तुम्ही लोकांना मदत का करत नाहीत. आता तुम्ही टेबलावर बसून काम करू नका, तुमचे प्रांत मॅडम नाहीत, तहसीलदार नाहीत कुठे गेले. ठीक आहे, त्या असतील फिल्डिवर. आता काय अडचणच आहे. याठिकाणी चाऱ्याचा आणि जेवणाचा विषय आहे. उद्या पूरग्रस्तांच्या जनावरांना चार मिळेल, अशी व्यवस्था करा. अशा शब्दांत खडेबोल सुनावले.

मंत्री दत्तात्रय भरणे यांना करावा लागला शेतकऱ्यांच्या संतापचा सामना
माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पाहणी करताना शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा मुद्दा मांडला. महापुरामुळे सर्व चारा वाहून गेला आहे, सर्वत्र गाळ साचलेला आहे, अशा वेळी जनावरांना काय टाकायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सामना करावा लागला.