समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ जून
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे. दि.२३ ते २५ जून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांकडून विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. तृतीय स्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकालातील एक वेळची बाब म्हणून राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.
सध्या वेगवेगळ्यात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. सदर आंतरजिल्हा बदली संचालक-१ आरोग्य सेवा, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदली करीता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकारी यांचेकडून दि.१२ जून पर्यंत अर्ज मागविण्यात येणार असून प्राप्त अर्जांची छाननी दि.१३ जून ते १९ जून पर्यंत होणार आहे. बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी दि. २० जून रोजी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि.२३ ते २५ जून या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना दि.७ जूलै २०२५ पर्यंत रुजु होणेसाठी मुदत देण्यात येणार आहे.
जिल्हा अंतर्गत बदली करणेकरीता शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदली प्रक्रिये संदर्भाने समिती स्थापन करणेबाबतच्या सुचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. यानिर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळेल.