स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज व्हा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूर जिल्हा आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ नोव्हेंबर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शिवाजीराव गरजे, महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा प्रदेश महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष नाझीर काझी, ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी, मुंबई येथील रॉयल हॉल, एन.एस.सी.आय. (डोम) येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी रणनीती आखण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा आमचा मानस आहे. मात्र,आवश्यक असल्यास स्वबळावरही लढण्यासाठी तयार राहा. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीस सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार संजय शिंदे, कल्याणराव काळे, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नगरसेवक तौफिक पैलवान शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी,अल्पसंख्यांक अयोग्य सदस्य वसीम बुरान, प्रदेश सचिव शशिकांत बापू कांबळे, प्रदेश सचिव इरफान शेख, अविनाश भडकुंबे,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सेवादलचे चंद्रकांत दायमा, मोहोळकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, महिला अध्यक्ष संगिता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्र कदम, प्रमोद भोसले, सलीम पामा, शफी इनामदार, अमीर शेख, आनंद गाडेकर, महादेव राठोड यांच्यासह पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष व पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश होता.सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला असून, पक्षाच्या धोरणांनुसार नागरिकांशी थेट संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम स्थान मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे बळ वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे मार्गदर्शन देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.