शहरातील प्रभाग क्र. २२ मधील रस्ते, ड्रेनेज व स्ट्रीटलाईट, आदी मूलभूत सोयीसुविधांच्या समस्यांवर रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
प्रभाग क्र. २२ मधील नागरिकांना रस्त्यांची दुरवस्था, खड्डेमय रस्ते, अपूर्ण ड्रेनेज कामे व बंद पडलेले स्ट्रीटलाईट, कचरा, पाणीपुरवठा, डासांचा उपद्रव, यांसारख्या गंभीर समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सामोरे जावे लागत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनादरम्यान रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यात रोपे लावून प्रशासनाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी बोलताना देवाभाऊ गायकवाड यांनी सांगितले”प्रभाग २२ मधील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. धोंडीबा वस्तीतील सुरू असलेल्या ड्रेनेज कामामुळे रस्ते खोदले गेले आहेत, त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. संसर्गजन्य रोगांचा धोका देखील गंभीर स्वरूप धारण करत आहे. याशिवाय प्रभागातील अनेक ठिकाणी रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरतो, ज्यामुळे अपघात आणि गुन्हेगारी घटनांची शक्यता वाढली आहे.”

पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, “सोलापूर महानगरपालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप सरकारने तातडीने लक्ष घालून खड्डेमुक्त रस्ते, अपूर्ण ड्रेनेज कामे पूर्ण करणे व बंद पडलेले स्ट्रीटलाईट दुरुस्त करणे, कचऱ्याची विल्हेवाट, फवारणी, योग्य प्रमाणात पाणीपुरवठा या उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”या आंदोलनात स्थानिक नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रशासना विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.

याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे , महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, भटके विमुक्त शहराध्यक्ष युवराज जाधव, हेमा ताई चिंचोळकर, रमेश जाधव, संजय गायकवाड, बालाजी जाधव, माऊली जाधव, डॉ.सायबु गायकवाड, निशांत गायकवाड, सुभाष वाघमारे, संदिपान सोनवणे, नागनाथ शावने, कमरुनिसा बागवान, मुमताज तांबोळी, चंदाताई काळे, मुमताज शेख, ज्योतीताई गायकवाड, सुनीता बेरा, मारता रावडे, नारायण जाधव, बजरंग गायकवाड, विकास जाधव, सुशीला गायकवाड, अंजना जाधव, संतोष गायकवाड, अंबादास जाधव, निशांत हाऊसनूर, सतीश गायकवाड, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते