रिक्षा चालकांच्या जाचक नियमाविरुद्ध आडम मास्तर आक्रमक : थेट मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा…
रिक्षाच्या फिटनेसचा दंड रद्द करा अन्यथा १६ जुलैला घालणार मुख्यमंत्री यांना घेराव
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि.०३ जून – राज्य शासन आणि परिवहन विभागाकडून रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. रिक्षांच्या परवाना मिळवण्यासाठी रिक्षा चालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. नूतनीकरण आणि त्याला होत असलेल्या विलंबाला दररोज पन्नास रुपये दंड आकारण्यात येत आहे. रिक्षांच्या परवाना नूतनीकरणासंबंधी लावण्यात आलेल्या अशा जाचक अटी आणि नियमांच्या विरोधात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.. कृती समितीच्या सोलापूरच्या आवाहनानुसार आणि दि. २९ जून २०२४ रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार आज दि. ३ जुलै २०२४ रोजी सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
या मोर्चाच्या अग्रभागी कॉ. आडम मास्तर, रियाज सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, कॉ. सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी २१ मे २०२४ रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरु झाल्यानंतर सदरची बाब ही रिक्षा चालकांना माहित झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला. रिक्षा फिटनेसकरिता असलेली ६०० रुपयांची ही विलंब शुल्कासह हजारो रुपयात जाऊ लागल्याने एकच खळबळ निर्माण झाल्याने सर्व संघटनानी शासनास निवेदन करून सदरची कारवाईही अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले म्हणून सर्वसमावेशक विचार करून सर्व संमतीने २९ जून २०२४ रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत. जर मागणी मान्य नाही झाली तर १६ जुलै चा कार्यक्रम केल्याशिवाय रिक्षा चालक स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा दिला आहे.
दरम्यान प्रमुख वक्ते प्रकाश आळंदकर यांनी शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षा चालक यामध्ये भरडले जात आहेत. मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात कॉ. आडम मास्तर यांनी रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठ्या-मोठ्या उद्योगपतींना करोडो-अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना मात्र दिवसाचे १२-१२ तास इमानेइतबारे राबून अहोरात्र प्रवाशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेससाठी दररोज ५० रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत. जोडीला ट्राफिक पोलीस असून रस्त्यावरून वाहन चालविताना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. कधी फोटो निघेल आणि कधी मेसेज येईल याचा पत्ता नाही. रिक्षा चालक कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवा म्हणून कष्ट करत असताना या जिजीया दंडामुळे मेटाकुटीला आलेला आहें. मा. मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना रिक्षा चालक घेराव घालून फिटनेसकरिता असलेल्या विलंब शुल्कातून रिक्षा चालकांना वगळण्याची मागणी करणार आहेत. आज कृती समितीकडे ५०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी रिक्षासहित घेराव आंदोलनात सहभागी होण्याकरिता नोंदणी केली आहे. आणखीन रिक्षा चालक यात सहभागी होतील.
पंढरपूरच्या विठोबाने शासनास सुबुद्धि दिलीतर हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द करतील अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी, जमीर शेख सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख (मेजर) यांनी उपस्थित राहून आपला पाठींबा व्यक्त करत रिक्षा चालकांच्या या आंदोलन प्रसंगी त्यांच्यासमवेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीज खान यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक चांदसाब मुजावर यांनी केले. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले, चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल मोरे, राजू सिद्धगणे, रफिक बागवान (विद्यार्थी वाहतूक), जब्बार शेख, बळी गायकवाड, वसंत माने, रफिक पिरजादे, अलीशेर मैंदर्गी, मौलाली दर्जी, शब्बीर फुलमामडी, अकिल शेख, रफिक काझी, सतीश गुंड, असिफ पठाण, नरेश दुगाणे शाम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.