प्रेम प्रकरणातून तरुणाला जबर मारहाण…१८ वर्षीय माऊलीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण ; भूम तालुक्यातील माऊलीची मृत्यूची झुंज अपयशी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ मार्च 

राज्यातील बीड आणि लातूर धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आलं आहे. धाराशीवमध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली होती. जखमी अवस्थेत तरुणाला सोलापूरमधील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माऊली बाबासाहेब गिरी असे तरुणाचे नाव होते. सोलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माऊलीची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांना एकुलता एक असणाऱ्या माऊलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित करताच आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. माऊलीच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील इतर नागरिकांना दुःख अनावर झाले होते.

  

      माऊली गिरी हा भूम तालुक्यातील पाभ्रुड येथे राहl होता. बारावीचे शिक्षण घेऊन सैन्य दलात भरती होण्याच स्वप्न माऊलीने पाहिले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना माऊलीचे वर्गातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण जुळले होते. मात्र, या अल्लड प्रेमात जात आडवी आली होती. मुलीच्या घरच्यांनी विरोध करत त्या मुलीचे लग्न लावून दिले होते. २ मार्च रोजी माऊली गिरीसोबत घात झाला. याच प्रेम प्रकरणातून त्याला मुलीच्या नातेवाईकांकडून जबर मारहाण करून धाराशिव जिल्ह्यातील एका जंगल परिसरात फेकण्यात आले होते. माऊलीच्या वडिलांना देखील फोन करून दमदाटी देण्यात आली होती. या प्रकरणी धाराशिव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत माऊली गिरीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी माध्यमांसमोर बोलताना संबंधित मुलीला आरोपी करा अशी मागणी केली आहे.माऊली गिरीच्या आई-वडिलांनी जखमी माऊलीला अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे उपचार करून सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. माऊलीच्या सर्वांगास मारहाण करण्यात आली होती. लोखंडी रॉड, काठ्यांनी जबर मारहाण झाल्याने त्याच्या किडन्यांवर देखील परिणाम झाला होता.

अखेर माऊलीची मृत्यूशी झुंज अपयशी…

माऊलीच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीचा परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केल्या पासून देवाकडे प्रार्थना करत होते. परंतु १६ मार्च रोजी रविवारी सकाळी माऊलीने प्राण सोडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *